वडसा, 13 ऑक्टोबर : गडचिरोली, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यात धुमाकूळ माजवत अनेकांच्या नरडीचा घोट घेणारा सिटी 1 वाघाला बेशुद्ध करुन जेरबंद करण्यास वनविभागाला अखेर आज 13 ऑक्टोबर रोजी यश आल आहे. वाघाला जेरबंद केल्याने वन विभागासह नागरिकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.
आजपर्यंत भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात सिटी 1 वाघाने धुमाकूळ माजवत कित्येकजणांचे बळी घेतला.
- गडचिरोली - 6
- भंडारा - 4
- चंद्रपूर - 3
गडचिरोली जिल्ह्यात 6, भंडारा जिल्ह्यात 4 आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 जण अशा एकूण 13 लोकांवर हल्ले करून त्यांना ठार केले होते.
वाघाला जेरबंद करण्यास वन्यजीव विभागाने परवानगी दिली होती. वाघाला पकडण्यासाठी वन विभाग मागील काही दिवसापासून प्रयत्न करीत होत्र मात्र वाघ वनविभागाला हुलकावणी देत होता. त्याला पकडण्यासाठी शार्पशुटरची चमु दाखल झालेली होती मात्र जंगलात झुडुपे वाढलेली व भरपूर पाऊस सुरु असल्याने वाघाला पकडण्यासाठी शार्पशुटरला अडचणी येत होत्या, आता जंगलातील वाटा सुकलेल्या असल्याने लवकरच वाघाला जेरबंद करण्यात येईल असे काही दिवसांपूर्वी वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी सांगितले होते. अखेर आज गुरुवार 13 ऑक्टोबर ला पहाटेच्या सुमारास जंगल परिसरात वाघाला जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले आहे.